
बिहारने जंगलराज नाकारून विकासाला मत दिलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन
पटणा, ता, 20 : “मला अभिमान वाटतो की बिहारच्या जनतेने बदल स्वीकारला आहे. त्यांनी विकासराजला पाठिंबा दिला आणि जंगलराजला नाकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जींचे मनापासून अभिनंदन करतो आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार जी तसेच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचेही हार्दिक अभिनंदन करतो,” असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी २० नोव्हेंबर रोजी बिहार राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी समारंभाला उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली.
ते पुढे म्हणाले, “बिहारच्या जनतेने दिलेला हा लँडस्लाईड विजय म्हणजे विकासावर शिक्कामोर्तब आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून विकासासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. तसेच नीतीश कुमार यांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवली व त्यामुळेच बिहारमध्ये आज सकारात्मक बदल दिसत आहे.”
शिंदे म्हणाले, “पूर्वी येथे जे वातावरण होते, ते पूर्णपणे बदलले आहे. आता येथे गुंडाराज नाही; लोकशाही, विकास आणि जनतेचे राज्य आहे. हे शक्य झाले ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वामुळे. त्यामुळे दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचेही खूप खूप आभार मानतो.”
……







