
शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा ओघ सुरुच, यवतमाळमध्ये उबाठाला खिंडार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सात नगरसेवकांचा पक्ष प्रवेश
नेर नगरपालिकेच्या तीन माजी नगराध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश
पश्चिम विदर्भातील १० हजार कार्यकर्त्यांचा लवकरच जम्बो पक्ष प्रवेश
ठाणे,
शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा ओघ सुरुच असून यवतमाळमधील नेर नगपालिकेच्या तीन माजी नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. या पक्ष प्रवेशाने यवतमाळ जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार पडले आहे. गुरुवारी रात्री उशिरा ठाण्यात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्याला शिवसेना मंत्री संजय राठोड उपस्थित होते. लवकरच यवतमाळ जिल्ह्यातील विविध पक्षांचे १० हजार कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
आज शिवसेनेत नेर नगरपालिकेचे उबाठाचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल, माजी नगराध्यक्ष सुनीता जयस्वाल, माजी नगराध्यक्ष वनिता मिसळे, नगरसेवक संदीप गायकवाड, दिलीप म्हस्के, साजिद शरिफ, नगरसेविका सरिता सुने, नगरसेविका दर्शना इंगोले, उबाठाचे अल्पसंख्याक आघाडीमा माजी जिल्हाध्यक्ष रिझवान खान, गणेश शीलकावार, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस लोकेश इंगोले, माजी जिल्हा परिषद सदस्य राकेश नेमनवार, पंचायत समिती उपसभापती संतोष बोडेवार, माजी सभापती अभय डोंगरे, विविध सहकारी संस्थेचे अध्यक्ष विलास ठाकरे, संचालक राहुल देहणकर, उबाठाचे महागाव शहर समन्वयक अविनाश देशमुख, भाजपचे पदाधिकारी तेजस ठाकरे, उबाठाचे सवनाचे पदाधिकारी रुपेश ठाकरे, अमोल जाधव, शुभम राठोड, निलेश भारती या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अडीच वर्ष महायुतीचा मुख्यमंत्री असताना राज्यात विकासाची कामे केली. लाडकी बहिण, लाडके भाऊ, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचे काम सरकारने केले. या कामाची पोचपावती म्हणून विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळाले. लाडक्या बहिणींनी महाविकास आघाडीचा चारी मुंड्या चीत केले. ज्यांना सत्तेत येण्याची स्वप्न पडत होती, ती धुळीस मिळाली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. महायुतीची दुसरी टर्म वेगाने काम करत आहेत. त्यामुळेच उबाठा, काँग्रेस आणि इतर पक्षातील शेकडो लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शिवसेना दिलेला शब्द पाळते म्हणूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेवर विश्वास ठेवून येत आहेत, असे ते म्हणाले. दिल्ली दौऱ्यावर असताना देखील यवतमाळमधील पदाधिकारी पक्ष प्रवेशासाठी ठाण्यात हे सर्व कार्यकर्ते एक दिवस मुक्कामी राहिले, याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक केले.