
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकणार असून शहरात पुन्हा एकदा विकासाची घोडदौड सुरू राहील, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. अंबरनाथ येथे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषा वाळेकर यांच्या सह अन्य उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
अंबरनाथ हे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सांगत त्यांनी येथील जनता विकासाच्या बाजूने ठामपणे उभी असल्याचा दावा केला.
शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनिषा वाळेकर या विक्रमी मतांनी विजयी होतील, तसेच त्यांच्या सर्व सहकारीही रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत शिंदे यांनी अंबरनाथमधील वातावरण पूर्णपणे शिवसेनेच्या बाजूने असल्याचे सांगितले. २० तारखेला सकाळी सात वाजता सर्व नागरिकांनी मतदान करून धनुष्यबाण या चिन्हासमोर बटण दाबावे, असे आवाहन करत त्यांनी शिवसेनेला दिलेले मत म्हणजे विकासाला दिलेले मत असल्याचे स्पष्ट केले. २१ तारखेला निकाल जाहीर झाल्यानंतर अंबरनाथमध्ये शिवसेनेचा दणदणीत विजय पाहायला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना ठरली असून अंबरनाथमध्ये दोन लाखांहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, असे शिंदे यांनी सांगितले. धर्म, जात, पंथ न पाहता सर्व महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली असून विरोधकांनी या योजनेला विरोध करून कोर्टात धाव घेतली तरी दिलेला शब्द पाळणारा असल्याने योजना बंद होऊ दिली नाही, असे ते म्हणाले. लाडक्या बहिणींनीच या निवडणुकीत चमत्कार घडवतील. प्रचारात महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पूर्वी अंबरनाथमध्ये रस्त्यांवरील खड्डे ही मोठी समस्या होती, मात्र आता शहरातील बहुतांश रस्ते काँक्रीटचे झाले असून अंबरनाथ धूरमुक्त शहर बनल्याचे चित्र दिसत आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिवमंदिर परिसर सुशोभीकरणासाठी ₹150 कोटींचा प्रकल्प, ₹54 कोटींची पाणीपुरवठा योजना, अंबरनाथ शूटिंग रेंज, नेहरू गार्डन, यूपीएससी अभ्यास केंद्र आणि धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह यांसारखे अनेक महत्त्वाचे विकास प्रकल्प शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला.
आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधांवर भर देताना शिंदे म्हणाले की, अंबरनाथमध्ये लवकरच कॅशलेस हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, दर्जेदार महाविद्यालये, उद्याने, मल्टीलेव्हल पार्किंग, एसआरए क्लस्टर विकास योजना आणि मेट्रो कनेक्टिव्हिटीसारखे प्रकल्प साकारले जातील. या विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, हा माझा शब्द असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर, आमदार डॉ. बालाजी किणीकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, जिल्हाप्रमुख राजेश कदम, कल्याण पश्चिम जिल्हाप्रमुख रवी पाटील आणि शिवसेनेचे अंबरनाथ नगर परिषदेचे सर्व उमेदवार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
……









