ठाणे,

कच्छी अस्मिता मंचच्यावतीने आयोजित ‘कच्छी पगडी कोणशिरे’ या गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी समाजाशी असलेले आपले कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करताना, ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणारा हा उपक्रम गेली सलग १९ वर्षे सुरू असून, प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहिलो असल्याचे त्यांनी सांगितले.
“घरातील कार्यक्रमासाठी जसे आपण कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहतो, त्याच भावनेतून मी या कार्यक्रमाला दरवर्षी येतो. कच्छी समाज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पगडी देऊन गौरवितो. अशा सन्मानामुळे समाजात आणखी चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते आणि समाजाचा सर्वांगीण विकास होतो,” असे शिंदे म्हणाले.यावेळी पुरस्कारासाठी निवड झालेल्या एका ४० वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या निधनाबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक सुरेश गडा यांच्या कार्याचे विशेष कौतुक करताना उपमुख्यमंत्री म्हणाले, “सुरेश गडा अनेक वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांचे खरे आणि निष्ठावान शिवसैनिक जर कोणी असतील, तर ते सुरेश गडा आहेत.” त्यांनी हिंदीतही भावना व्यक्त करत, “चालीस साल से शिवसेना के साथ खड़ा, उसका नाम है सुरेश गडा,” असे गौरवोद्गार काढले.
आषाढी बीज हा कच्छी समाजाचा नववर्षाचा सण असल्याचे सांगत त्यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. “जसा मराठी माणसांसाठी गुढीपाडवा महत्त्वाचा आहे, तसाच कच्छी समाजासाठी आषाढी बीज हा नववर्षाचा प्रारंभ आहे,” असे त्यांनी नमूद केले.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, ठाण्यातील व्यापारी आणि व्यावसायिकांना कोणताही त्रास होऊ नये, ही दिघे साहेबांची भूमिका होती. त्यांनी सुरू केलेली व्यापारी हिताची परंपरा आजही कायम असून, ठाण्यात व्यापारी सुरक्षित असल्यामुळे उद्योग-व्यवसाय अधिक वेगाने वाढत आहेत.
ठाण्याच्या विकासकामांची माहिती देताना त्यांनी सांगितले की, शहरात उत्कृष्ट रस्ते, मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड, डबल डेकर रस्ते यांसारखी महत्त्वाकांक्षी कामे सुरू आहेत.
अहमदाबाद-घोडबंदर मार्गावरील वाहतूक थेट कोस्टल रोडमार्गे मुंबईकडे वळविण्यात येणार असल्याने ठाणे शहर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीतून मुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाणे महापालिकेवर फडकवलेला भगवा आजही अभिमानाने फडकत असल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेच्या कार्याची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
ठाणे हे विविध समाज, साहित्यिक, कलाकार, उद्योजक आणि व्यापाऱ्यांचे शहर बनत असून, आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शहराची ओळख अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी सांगितले. “व्यापारी सुरक्षित आणि आनंदी असेल, तरच व्यापार वाढतो. शहराच्या विकासात व्यापारी समाजाचे मोठे योगदान आहे. त्यांची सुरक्षितता आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
“ठाणेकरांनी मला शाखाप्रमुखापासून मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री होण्यापर्यंत साथ दिली. त्यामुळे आपले नाते हे केवळ राजकीय नसून कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे आहे,” असे भावनिक उद्गारही त्यांनी काढले.
साकेत परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य त्रिमंदिराचा उल्लेख करत त्यांनी, आता कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीचे काम सुरू होत असल्याची माहिती दिली. महावीर हॉस्पिटलसह विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातही मोठे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड काळात महापालिकेचा एकही रुपया न खर्च करता समाजाच्या सहकार्याने कोविड सेंटर उभारण्यात आले होते, याची आठवण करून देत त्यांनी समाजाच्या एकजुटीचे कौतुक केले.
ठाण्याचा आणखी वेगाने विकास करण्यासाठी सर्व समाजघटकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कच्छी पगडीसारख्या उपक्रमांमुळे समाजातील विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट व्यक्तींना प्रेरणा मिळते आणि समाजकार्याला नवी दिशा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी आमदार मुरजी पटेल आणि ठाणे मनपाच्या नगरसेविका परीशा सरनाईक यांचाही त्यांनी उल्लेख केला. तसेच महापौर निवडणुकीच्या काळातील एक आठवण सांगताना, कच्छी समाजात झालेल्या बैठकीत एका पोलीस अधिकाऱ्याची बाळासाहेब ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलण्याची इच्छा आपण पूर्ण केली होती, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर ठाण्याचा महापौर शिवसेनेचाच झाला, अशी आठवण त्यांनी उपस्थितांसमोर सांगितली.
समाजसेवेत सातत्याने योगदान देणाऱ्या कच्छी समाजाचे कौतुक करत, “समाजहितासाठी अशीच एकजुटीने काम करत राहा. शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” असे आवाहन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
यावेळी आमदार मुरजी पटेल, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना गटनेते पवन कदम, शिवसेना ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, कच्छ अस्मिता मंचाचे अध्यक्ष सुरेश गडा, प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कच्छी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…..












