
ठाणे: (४ डिसेंबर) ठाणेकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण करण्याच्या उद्देशाने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ओवळा -माजिवडा मतदार संघाचे आमदार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले. यावेळी ठाणे महापालिकेचे अधिकारी व भागातील संदिप डोंगरे, रवि घरत, भगवान देवकाते, हेमंत खांडेकर यांच्या सह माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या भरघोस निधीतून ठाणे शहरातील विविध भागात जलतरण तलाव, समाज भवन , स्मशानभूमीचे लोकार्पण करण्यात आले. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सर्वांचा एकत्रित विकास साधण्यासाठी ८०% समाजकारण व २०% राजकारण या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित कार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करण्याऐवजी वर्षातील ३६५ दिवस सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध असणारे आम्ही कार्यकर्ते आहोत.
जलतरण तलावांचे लोकार्पण
आनंद नगर, ठाणे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे २ जलतरण तलावांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. या आधुनिक जलतरण तलाव प्रकल्पाची निर्मिती परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकार झाली आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने स्थानिक नागरिक, पदाधिकारी व मान्यवर यांच्या मोठ्या उपस्थित होते.
शहरातील नागरिकांसाठी आरोग्य, क्रीडा व जलतरणाच्या सोयीसुविधा वाढाव्यात या उद्देशाने हे प्रकल्प उभारण्यात आले असून आधुनिक तांत्रिक सुविधा असलेला हे जलतरण तलाव परिसरातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणार आहे, असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले.
फुटबॉल टर्फची निर्मिती
फुटबॉल टर्फ
महापालिका क्षेत्रामध्ये अनेक फुटबॉल प्रेमी असून फुटबॉल खेळाच्या प्रशिक्षणासाठी योग्य मैदान व जागा उपलब्ध नसल्याने क्रिडाप्रेमींची प्रचंड कुंचबना होत होती. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी याबाबत केलेल्या मागणीमुळे स्थानिक आमदार व परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे मागणी केली.
या ठिकाणी फुटबॉल टर्फ बरोबरच नायलॉन नेट, लँडस्केपिंग, चेंजिंग रूम, शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच आकर्षक प्रवेशद्वार, इत्यादी ची निर्मिती करण्यात आली आहे.
फुटबॉल खेळत असताना खेळाडूंना इजा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. आमदार श्री. प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेनुसार उभारण्यात आलेल्या या फुटबॉल टर्फला चारही बाजूंनी लोखंडी जाळी असून पूर्णपणे रबरी सोलींगमुळे (टर्फ) खेळाडूंना कुठल्याही प्रकारे इजा होणार नाही. त्याचबरोबर मैदानाच्या चोहोबाजूंनी फ्लड लाईटची व्यवस्था असल्याने रात्री १० वाजेपर्यंत सुध्दा या ठिकाणी खेळाडूंना सराव करता येऊ शकेल. प्रत्येक फुटबॉल टर्फच्या ठिकाणी प्रशिक्षित प्रशिक्षकांची सोय असल्याने फुटबॉलच्या नियमावलीनुसार या ठिकाणी खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाईल त्यामुळे ठाणे शहरातून भविष्यामध्ये पेले सारखे जागतिक दर्जाचे फुटबॉल खेळाडू निर्माण होतील, अशी अपेक्षा मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.
अत्याधुनिक स्मशानभूमी
स्मशानभूमी
माजिवडा येथील जुन्या स्मशानभूमीत अनेक गैरसोयी असल्याने अंत्यविधी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सर्व सुविधा मिळण्याकरिता जुन्या झालेल्या सर्व स्मशानभूमींचे अद्ययावत पद्धतीने सुशोभीकरण करून त्यात गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या बसविल्या जाव्यात व संपूर्णपणे स्माशानभूमीचे नव्याने सुशोभीकरण व्हावे यासाठी स्थानिक आमदार व परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक प्रयत्नशील होते.
ठाणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली असून अनेक स्मशानभूमीच्या परिसरात नागरीकरण झाले आहे. पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने लाकूड जाळून अंत्यसंस्कार केले जातात, त्यामुळे तेथील राखेचा-धुराच्या वासाचा त्रास नागरिकांना होतो. स्मशानभूमीमधून राखेचे धूलिकण उडतात, अनेकांच्या घराच्या खिडकीवर-एसीवर बसतात. त्यामुळे स्मशानभूमीच्या परिसरात प्रदूषण होत असल्याच्या तेथील नागरिक तक्रार करीत होते. तसेच इलेक्ट्रिक म्हणजेच विद्युत दाहिनी बसविल्यास त्यावर वीज बिलाचा खर्च अधिक होतो. त्यामुळे ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी आता स्मशानभूमींचे नूतनीकरण करताना सीएनजी / एलपीजी गॅस दाहिनी मशीन बसविण्यात आली आहे. त्याचवेळी तेथे ‘स्मोक न्यूसन्स अबेटमेन्ट सिस्टीम’ म्हणजेच ‘धुराचा उपद्रव कमी करणारी यंत्रणा’ बसवली आहे. या यंत्रणेमुळे अग्निसंस्कार झाल्यानंतर प्रदूषण होत नाही. म्हणजे बॉयलरमध्ये धूर व राखेचे कण जातात, त्याचे शुद्धीकरण त्या मशीनमध्ये होते व शुद्ध झालेली हवा ३० मीटर उंच चिमणीमधून शुद्ध करून बाहेर फेकली जाते. या आधुनिक यंत्रणेमुळे ८० टक्के वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
स्मशानभूमीला संरक्षक भिंत व प्रवेशद्वार, आतमध्ये अंत्यविधीसाठी येणाऱ्यांची बैठक व्यवस्था, अंत्यविधी हॉल, श्री शंकराचे मंदिर, स्मशानभूमी परिसरात गार्डन व लॅन्ड स्केपिंग, आतमध्ये प्रकाश व्यवस्था व पाण्याची सुविधा, डिलक्स स्वछतागृह, प्रार्थना हॉल, पार्किंगची सुविधा, स्मशान भूमीमध्ये पेव्हर ब्लॉक, नातेवाईकांच्या आंघोळीची सोय, सोलार दिवे व सोलार बंब अशा सर्व सुविधा सुशोभीकरणात केल्या आहेत. तसेच ज्याठिकाणी सीएनजी गॅस पुरवठा आहे तिथे सीएनजीवर दाहिनीची सोय केली आहे. तर जिथे सीएनजी नाही तिथे एलपीजी गॅसवर दाहिन्या चालवल्या आहेत. गॅसवर चालणाऱ्या दाहिन्यांमुळे खर्चही अर्ध्याने कमी होईल तसेच प्रदूषणही होणार नाही. या सर्व स्मशानभूमीमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे २ मशीन लागले असून संपूर्ण सुशोभीकरण केले आहे.
उपरोक्त विकासकामांबरोबर वर्तक नगर येथील वारकरी भवनाचे भूमिपूजन व सामाजिक सभागृहाचे लोकार्पण, लोढा पॅराडाईज उद्यानाचे लोकार्पण संपन्न झाले.








